भारतात फॅसिझमची बीजे आहेत_ बाबूराव बागूल

अगदी चार शद्बात फॅसिझमचे वर्णन करायचे तर हिंसक अहंकार आणि इतरांविषयी तिरस्कार , असे करता येईल. या अहंकाराचा आणि तिरस्काराचा साक्षात प्रत्यय भारतात हजारो वर्षांपासून हजारो लोकांना येतो आहे. अस्पृश्यता म्हणजे या अहंकाराचे आणि तिरस्काराचे एक भयंकर रुप आहे.

फॅसिझम म्हणजे भारतीयांच्या वर्णवादाची नवी आवृत्ती , आणि फॅसिझमचे तत्वज्ञान म्हणजे वर्णवादाचा पुरस्कार करणारे नव्या परिभाषेतील हिंदू तत्वज्ञान. परमेश्वर आणि त्याचे सर्वश्रेष्ठत्व मान्य केले की , पुरुषोत्तम , प्रेषित , अवतारी पुरुष , अवतार , परमेश्वराचे प्रियत्व , आणि प्रतिनिधित्व प्राप्त झालेले महाभाग मान्य करावे लागतात आणि असे मान्य केले की , ज्येष्ठ आणि कनिष्ठ , उच्च आणि नीच हेही मान्य करावे लागते.

ईश्वर , परमात्मा मान्य केला की आत्म्याचे सातत्यही मान्य करावे लागते.तसेच हिन , पापी , आत्मा मान्य करावा लागतो. म्हणजेच श्रेष्ठ आणि पुण्यात्माही मान्य करावा लागतो. पाप-पुण्य , ज्येष्ठ-कनिष्ठ , उच्च-नीच ही विषमता मान्य करावी लागते.


अहंकार आणि तुच्छता हा पाया

विषमतेचा पुरस्कार करण्यासाठी वर्णवादी हिंदू तत्वज्ञानाने कर्म , पुनर्जन्म , पूर्वकर्म , पूर्वपाप , पूर्वपुण्य इत्यादी संकल्पनांचा शोध लावला. ईश्वरी न्यायबुद्धीनुसार माणसाला जन्म मिळतो. त्या जन्मात मिळणारे सुख , सन्मान , समृद्धी , श्रेष्ठत्व , हे पूर्वजन्माच्या पुण्याचे फळ असते. ज्यांनी पूर्वजन्मी पुण्याच्या राशी निर्माण करुन ठेवल्या आहेत त्या पुण्यवंतांना पवित्र कुळात , मोठ्या कुळात जन्म मिळतो , आणि तोच पूर्वपुण्याईवर , ईश्वरी कृपेच्या जोरावर सर्व सुखे भोगण्याचा अधिकारी असतो. परंतू ज्याने पूर्वजन्मी पापाच्या राशी रचल्या आहेत , त्यांना दुःख , दैन्य , दास्य आणि अस्पृश्यता चिरंजीव राहण्याचे कारण हे तत्वज्ञान असते.

या तत्वज्ञानातूनच भारतीय संस्कृती आणि भारतीय मने तयार झाली आहेत. अहंकार , तुचछता , वैर , मत्सर , द्वेष , दुःख , दैन्यबद्धल , दुःखी , कष्टी लोकांबद्धल उपेक्षा ही भारतीय मनाची व संस्कृतीची वेशिष्टे आहेत. यामुळेच अस्पुष्यतेविरुद्ध आदिवासींच्या पशुतुल्य जीवनासंबंधी एकही आवाज भरतीय धार्मिक आणि ललित साहित्यात उठलेला दिसत नाही. अनेक संत , महंत आणि महात्मे आले पण कोणीही सामाजिक दुःखाविरुद्ध , सामाजिक विषमतेविरुद्ध , वैचारिक अथवा सशस्त्र लढा केलेला नाही. सेवाभावेने कोणीही दलित , उपेक्षित , वंचित , स्त्री , आणि शूद्र यांच्यासाठी संस्था अथवा संघटना केलेल्या नाहीत. हजारो वर्षात अगणित संत , महात्मे , बुद्धीवंत पंडित , महापंडित कवी , महाकवी आले पण कोणीही या तत्वज्ञनाच्या एखाद्या संकल्पनेविरुद्ध आवाज उठवला नाही. कुणाच्याही बुद्धीला एकाही संकल्पेनेतील व्यर्थता जाणवली नाही.

म्हणजे सर्वजण हे विषमतेचा पुरस्कार करीत होते , हे सर्वच निष्ठुर सुलतानी सत्तेचे सेवक होते असे म्हणता येत नाही. तरीही त्यांनी स्त्री-शूद्र , अतिशूद्रांची दुःस्थिती मान्य केलेली होती. कारण त्यांचे मन तसे घडवलेले होते. एकेकाळी सोशॅलिस्ट-कम्युनिस्ट तत्वज्ञान मान्य करणारा जर्मन माणूस फॅसिस्ट होऊन वंशवादी कसा झाला याचे उत्तर इथे आहे.


तात्विक बैठक फॅसिझमला सोयीची

मानवेन्द्ननाथ रॉय यांनी आपल्या पुस्तकात आणि ठिकठिकाणी केलेल्या भाषणांत भारतीय तत्वज्ञानाची फॅसिझमबद्दलची अनुकूलता स्पष्ट केलेली आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही या वर्णवादी , विषमतावादी तत्वज्ञानाचा , त्यातून निर्माण झालेल्या समाजव्यवस्थेचा आणि अर्थव्यवस्थेचा सतत निषेध केला आहे. तरीही वर्णव्यवस्था आणि वर्णव्यवस्था मान्य करणारे मन , समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था अजूनही अस्तित्वात आहे.

भारतामध्ये फॅसिझम हा जर्मनीप्रमाणे भांडवलशाहीच्या गरजेतून येईल असे वाटत नाही. परंतू फॅसिझम हा आलाच तर तो वर्णव्यवस्था आणि तिचा इतिहास मानणा-या वर्गाकडून येण्याची शक्यता आहे. या वर्गाने राष्ट्रीय स्वातंत्र्यचा लढा हा सामाजिक क्रांतीचा लढा होऊ दिला नाही. या वर्गाने सर्व लढे वेगवेगळ्या परिघामध्ये ढकलून दिले आणि देशाला सामर्थ्यशाली आणि अभिनव करू बघणारे विचार आणि कार्य एकाकी पाडले. त्यामुळे स्वातंत्र्याचा लढा लढत असताना जे महामंथन होणार होते आणि त्यातून स्त्री-शूद्र यांना केंद्र करुन स्वातंत्र्य , त्यांनी जे हजारो वर्षापासून सत्ता , संपत्ती आणि श्रेष्ठत्वाचे स्वामी होते त्याच वर्गाच्या आणि वर्णाच्या स्वाधीन केले.


धर्म-संस्कृतीत फॅसिझमची बीजे

हजारो वर्षापासून अस्पृश्य आहेत , आदिवासी आहेत आणि स्त्रीबद्दलचा तुच्छतावाद आहे , याचा अर्थ असा की , फॅसिझमची मनोभूमिका इथे धर्म , संस्कृतीने तयार करुन ठेवलेली आहे. म्हणून लोकशाही वर्णव्यव्स्था आणि मनुस्मृती या परस्परविरोधी सत्ता , विचार आणि आचारपद्धती अस्तित्वात आहेत. विजय कोणाचा व्हावा याचा विचार दलित जनता कसा करील त्याचाच विचार होणार आहे. समाजवाद , लोकशाही याचा पुरस्कार दलितांचे अग्रदल असलेल्या आंबेडकरी चळवळीने केलेला आहे. लोकशाही समाजवादाचे महान पुरस्कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी केलेल्या विचारांतून स्टेटस् अँड मायनॉरिटिज या पुस्तकातून लोकशाही समाजवादाची मुलभूत तत्वे हिरिरीने मांडली आहेत. अस्पृश्यतेचा उच्चाटनाचा लढा करणे याचाच अर्थ सामाजिक , आर्थिक , सांस्कृतिक , राजकिय आणि मानसिक परिवर्तनाचा लढा करणे होय.

बाबासाहेबांनी या सम्यक क्रांतीचा आरंभ करुन ठेवलेला आहे. एवढेच नव्हे तर भारतीय लोकशाहीला वर्णव्यवस्थेची बैठक मिळू नये आणि जातीभेदातून वाढणारी आणि जातीभेद टिकवणारी लोकशाही राहू नये म्हणून त्यांनी लोकशाहीला वर्णावादाविरुद्ध असलेली अनात्मवादी , अनीश्वरवादी , बुद्धीप्रामाण्यावादी परंपरा देण्यासाठी बौद्ध धर्माची पुनःस्थापना केली. लोकशाही समाजवादाची राखणदारी करण्याची जबाबदारी अशा त-हेने दलित जनतेच्या शिरावर बाबासाहेबांनी टाकलेली आहे , या जबाबदारीचा अंगिकार दलित जनतेशी संबंध असलेल्या दलित साहित्याने केलेला आहे.

साहित्य कधी दलित नसते आणि साहित्याचा नायक होणारा माणूसही दलित नसतो. हे ठाऊक असूनही दलित - साहित्य हे नाव घेतले गेले आहे. ज्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःला अस्पृश्य-दलित म्हणवून घेत होते , अथवा भगवान बुद्धांचे मत प्रतिपादीत होते आणि ज्याकरिता अनेक क्रांतिकारक धर्मसत्तेच्या आणि दंडसत्तेच्या विरोधात देशोदेशी उभे ठाकले होते त्याचकरिता दलित साहित्य हे नाव धारण केले आहे आणि आपली प्रतिबद्धता आणि वामत्व सिद्ध केले आहे.

आता एक लघुतमकथा सांगून हा लेख संपवत आहेः महाराष्ट्र शासनाने अस्पृश्य अनुसूचित नोकरदारांच्या संदर्भात एक जी , आर. अलीकडेच प्रकाशित केला आहे. तो जी. आर. वाचून एका सरकारी कचेरीतील कारकून मंडळींनी आणि अधिका-यांनी छळ करुन एका मागासवर्गीय तरुणाला आत्महत्या करण्यास भाग पाडले.


या आंबेडकर , या जगजीवनराम

साले आमचे नशीब गांडू , म्हणून आम्ही महार झालो नाही, झालो असतो तर मॅट्रीक पास झाल्याबरोबर नोकरी आणि दुस-यावर्षी ऑफिसर अशा अनेक कथा , अनेक संवाद अनेक ऑफिसातून रोज घडत आहेत आणि केवळ इथे जन्म घेतला म्हणून अवमानाचे , उपेक्षेचे , दुय्यम , दर्जाचे , नागरिकत्व दलितांना सहन करावे लागत आहे. संहार तेव्हाही होत होता , आताही होतो आहे. आता हत्यारे फक्त दिसत नाहीत , पण ती बाहेर येणार नाहीत याची शाश्वती देण्याएवढी लोकशाही आणि समाजवाद समर्थ आहेत असे वाटत नाही. लोकशाही समाजाचे मानसीकरण , संस्कृतीकरण झाले तरच ही स्थिती पलटू शकेल.